शिवसेनेतून मोठा झालेला कोल्हा आज शिवसेनेवर बोलतोय : आढळराव पाटील

0
पुणे : राज्यात महाविकास आघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलाच संघर्ष उफाळला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ठिणगी पडली आहे. आढळराव पाटील यांच्यावर टीका करताना खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद असल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत’, असं कोल्हे म्हणाले होते. खासदार कोल्हे यांनी केलेल्या टीकेनंतर आढळराव पाटील यांनी चांगलाच पलटवार केला आहे.
माध्यमांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “बायपास रस्त्याचं काम मी खासदार असताना सुरु झालं होतं. या कार्यक्रमाला मला डावलण्यात आलं. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावं एवढीच माझी अपेक्षा होती. कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावं. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे?,” असं आढळराव पाटील म्हणाले.
“थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राट नाही”, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.