पुणे : सराफ व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून ट्रॅव्हलमधून प्रवास कोट्यावधींचे सोने अन रोकड चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त पुणे ग्रामीणच्या राजगड पोलिसांनी केला आहे. या टोळीतील दोघांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल एक किलो सोने जप्त केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मारूती राजाराम पिटेकर (रा. माळंगी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व आनंता लक्ष्मण धांडे (रा. वालवड, ता. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात कमलेश सुकनराज राठोड (रा. कर्नाटक) यांनी तक्रार दिलेली आहे.
पंधरा दिवसांपुर्वी (दि. ११ ऑक्टोंबर) तक्रारदार हे व्हि.आर.एल. ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. त्यादरम्यान, त्यातूनच प्रवास करणाऱ्या तिघांनी त्यांच्याजवळील १८ लाख रुपयांची रोकड व ८१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठा खळबळ उडाली होती. या गुन्ह्याची गांर्भिय ओळखून अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाकडून सुरू होते.
यादरम्यान, तक्रारदार कर्नाटक राज्यातील एका गावात सोने देण्यासाठी गेले होते. तेथून पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी पोलीसांनी तेथे संशयितांची छायाचित्रे मिळाली. त्यांचा तांत्रिक तपास केला असता त्यांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यांची माहिती घेत असताना ते अहमदनगर तसेच सोलापूर जिल्ह्यातून या दोघांना पकडण्यात आले आहे. चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून ९८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोघेही पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापुर्वीचे प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत.
आरोपी व त्यांचे नातेवाईक महाराष्ट्र तसेच कर्नाटकात रेकीकरून गुन्हे करत असत. होलसेल व्यापारी हे दुसऱ्या राज्यात जाऊन सोन्याचे दागिने दुकानदारांना विकत असतात. अशा व्यापारांवर ते पाळत ठेवत. ते जेथे जातील व राहतील तसेच त्यांच्यासोबत राहत व फिरत असत. संशय येऊन म्हणून देवदर्शनाला आल्याचे सांगत. प्रवास करत असतानाही ते ज्या वाहनाने प्रवास करतील त्याच वाहनाने प्रवासकरून व्यापाऱ्यांचे लक्ष नसताना व झोपल्यानंतर चोरून नेत.