दोन तृतीयपंथीयांनी केला एकाचा खून; आकुर्डी येथील घटना

0

पिंपरी : पैशांच्या कारणावरून दोन तृतीयपंथीयांनी मिळून एका व्यक्तीचा गळा आवळून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काळभोरनगर, आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत उघडकीस आली.

अंजली बाळू जाधव (25, रा. गणेशनगर, थेरगाव), अनिता शिवाजी माने (26, रा. गणेशनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपी तृतीयपंथ्यांची नावे आहेत. बसराज भिमाप्पा इटकल (38, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एक व्यक्ती काळभोरनगर, आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीच्या गळ्याभोवती गळा आवळल्याचे व्रण होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

दरम्यान, घटनास्थळी दोन तृतीयपंथी रात्रीच्या वेळी थांबत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी अंजली आणि अनिता या दोन तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांची ही लपवाछपवी जास्त वेळ टिकली नाही. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. हा खून पैशांच्या कारणावरून केला असल्याचे आरोपी तृतीयपंथ्यांनी पोलीस तपासात सांगितले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.