मुंबई : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे सरकारने रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती केली.
रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. ते फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिले आहेत. तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे एप्रिल 2021 पासून महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. अखेर आज रजनीश सेठ यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई 26/11 जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी एका फोर्स वन पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी ते या पथकाचे प्रमुख होते. रजनीश सेठ हे दोन वर्षे मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची नियुक्ती करण्याची एक पद्धत आहे. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवावी लागतात. युपीएससीकडून त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करतात.
यातून पूर्णवेळ महासंचालकाची नियुक्ती केली जाते. हेमंत नगराळे, के. वेंकटेशम, रजनिश सेठ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस युपीएससी कडून करण्यात आली होती. यानंतर रजनीश सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.