मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरु होते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी आझाद मैदानात जाऊन संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये संभाजीराजेंच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेतले.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आझाद मैदानावर येवून शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्याकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्या एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. सगळ्या प्रश्नावर साधक बाधक चर्चा झाली. प्रत्येक मुद्यावर चर्चा झाली. बाकी काही आता ठेवायचे नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. राज्य शासनाच्या वतीने जे काही करु शकतो, ते आपण करु. राज्य सरकार आपल्या भुमिकेशी सहमत आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. आपल्या लढ्याला यश मिळाले आहे. आजचा विजयाचा दिवस आहे.
सार्थीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरु करण्यात येईल.
सार्थीचे व्हिजन १५ मार्च पर्यंत, संपूर्ण रिक्त जागा भरणार,
महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी देण्यात येणार.
परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कर्ज रक्कम १० लाखावरुन १५ लाख करण्यात आली आहे.
१५ मार्चपर्यंत दोन संचालक नियुक्त करण्यात येणार.
कोपर्डी प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात येणार.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी, निर्णय घेण्यात येणार. त्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे.
मराठा आंदोलनात मृत पावलेल्याच्या वारसदारांना ११ जणांना नोकरी मिळली. इतरांच्या कागद पत्रांची पूर्तीता होताच त्यांनाही नोकरी देण्यात येणार.
सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेशापूर्वी नियुक्त झालेल्या इएसबीसी व एसइबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.