कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजप पक्षात मोठी फूट पडली आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगले तालुक्याचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ‘पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा ज्या पद्धतीनं पराभव झाला, तो पक्षातील व परिवारातील जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला लागला आहे.
प्रदेशाध्यक्ष पाटील व जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे या दोघांवर निवडणुकीची प्रामुख्यानं जबाबदारी होती. मात्र, या दोघांनीही ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर विसंबून राहून एकतर्फी विजय होईल, अशा भ्रमात ते राहिले. त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळंच भाजपचा एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला,’ असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.