मुंबई ः ”गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल, मग पडेल, उद्या पडेल, आता पडलंच, हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशिर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकास कामं केली”, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधांना लगावला आहे.
फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेची संवाद साधत होते. करोना अजून गेला नाही, त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले की, ”हदारी सुरू झाली आहे. येणं जाणं सुरू झालं आहे. पण कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा सांगत राहणं हे माझं कर्तव्य आहे. मार्चपासून राज्यात करोनाचे रुग्ण दिसायला लागले. त्याची वाढ कशी झाली. याची आठवण करून देण्याचं कारण आता हिवाळा आलेला आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथी पसरल्या नाहीत. पण, आता रहदारी वाढल्यानंतर थंडीतील आजार दिसू लागले आहेत. यावर एकच उपाय आहे. मास्क लावणं, हात धुत राहणं आणि डिस्टन्स पाळणं”, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेसमोर केले.