सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे ः उद्धव ठाकरे

0

मुंबई ः “पुनश्च: हरिओम म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. तेव्हा करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे”, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर नववर्षानिमित्त मांडले.

“गेले वर्षभर संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी करोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे”, असेही मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सूचना करताना म्हणाले की, “करोना संसर्गामुळे एक नवी जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यात मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करत आहोत. वर्क फ्राॅम होम, ऑनलाइन शिक्षण, यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग केला जात आहे. अशावेळी पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला, पण करोना विषाणूच्या बदलत्या रूपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे”, अशा सूचना मुख्यमंक्षी ठाकरे यांनी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.