नवले पुलाजवळ भीषण अपघात ! चौघांचा मृत्यु तर 18 जण जखमी

0

पुणे : मुंबई -बंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ (नवले पुलाजवळ) उलटलेल्या ट्रकला खासगी बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा जागीत मृत्यु तर 18 जण जखमी झाले आहेत. वाहनात अडकलेल्या 18 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. ट्रक आणि बस दोन्ही वाहने उलटली असल्याने त्यातील चालक व प्रवाशांना वाचविण्यासाठी जवळपास 2 तास रेस्क्यु ऑपरेशन सुरु होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात घडला होता.

याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रकचालकाचे उतारावर नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे जात असलेल्या खासगी बसला जोरात धडक दिली. हा अपघात इतका जोरात होता की त्यात ट्रकचे केबिनचा चक्काचूर झाला. ट्रक उलटला व त्यात ट्रकचालक खाली अडकला. तसेच खासगी बसही उलटली. या अपघाताची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे 4 अग्निशमन वाहने, 1 रेस्क्यु व्हॅन, पीएमआरडीएची1 रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी पोहचली.

उलटलेल्या बसच्या वरच्या बाजूच्या काचा फोडून जवानांनी आतमधील प्रवाशांना हाताने व दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. पुढील बाजूला काही महिला व एक मुलगी अडकली होती. मुलीचे हात व पाय अडकले होते. पुल कटरच्या सहाय्याने बाजूच्या वस्तू कापून तिची सुटका केली. तेव्हा तिचे केस अडकलेले आढळून आले. तेव्हा जवानांनी तिचे केस कापून तिची सुखरुप सुटका केली. तसेच ट्रकमधील चालकाला अशाच पद्धतीने बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले.

या अपघाताने मुंबई -बंगलोर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने सरळ करण्यात आली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण रस्त्यावर पडलेली साखरेची पोती बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरुळीत होऊ शकली. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस,वाहतूक विभाग,अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.