महाराष्ट्रात संतापाची लाट; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. भाजपा आणि शिंदे गट वगळता मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेनेने राज्यापालांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतल्याने अखेर राज्यापालांना नमते घेत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

महाराष्ट्राचा अवमान होईल असे वक्तव्य केल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचे योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

राज्यपालांनी पुढे म्हटले आहे की, काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.

अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल.
एका समाजाचे कौतुक हा दुसर्‍या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे म्हणत कोश्यारी यांनी निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईत एका नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही. या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी इ. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.