मुंबई : आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबई विभागातर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी शिवसैनिकांनी आम्ही काय अतिरेकी आहोत काय, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला.
चर्चगेट स्टेशन बाहेरील भागात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी टाळ-मृदग वाजवत सरकारचा निषेध व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी केली. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यात दंगली होऊ लागल्या आहेत. काल आळंदीत वारकऱ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीमार केली. ही घटना निंदनिय आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है’, अशा घोषणा देण्यात आल्या. तर आम्हाला ताब्यात का घेता, आम्ही काय अतिरेकी आहोत काय, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.