पुणे : खुन्नस देत असल्याच्या कारणावरून २३ वर्षीय तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करत परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला.
भूषण ऊर्फ संकेत आनंद तारू (वय २१, रा. कसबा पेठ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. केतन संजय चव्हाण (वय २१, रा. गाडीतळ), पवन उर्फ रुद्र युवराज ढिले (वय १९), हर्षद संजय पवार (वय १८) आणि फैजान अशपाक शेख (वय २०, रा. कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. तर उदय जितेंद्र लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल आहे.
याबाबत रहीम अल्ताफ कुरेशी (वय २३, रा. सदानंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सदानंदनगर परिसरात घडलेल्या घटने दरम्यान फिर्यादीसह त्यांच्या दोन मित्रांना मारहाण करण्यात आली होती. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर भूषण याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. अर्जदार आरोपी हा सरार्इत गुन्हेगार असून त्याच्यापासून फिर्यादी यांच्या जिवास धोका आहे. त्याला जामीन दिल्यास शहरात टोळीयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारू याचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर यांनी केला. या गुन्ह्याचा तपास समर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एच. बी. खोपडे करीत आहेत.