मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी : भाई जगताप

0
मुंबई : काँग्रेसचा झेंडा अंगाखांद्यावर बाळगणार्‍या कार्यकर्त्यांचा विचार करून काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २२७ जागांवर निवडणूक लढवावी असे माझे मत आहे आणि मी त्यासाठी आग्रही राहील असे सांगत काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुंबईच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर भाई जगताप यांनी जेजुरीच्या खंडेरायाला जात भंडारा उधळला. त्यानंतर मुंबईला परत जात असताना पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. भाई जगताप म्हणाले, मुंबई महापालिकेत एक वेळ काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये ही संख्या ३५ वर आली आहे. या संख्येत वाढ करण्यासाठी काँग्रेसच्या अनुभवी पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आगामी सहा महिन्यात काही उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधिक बोलताना भाई जगताप म्हणाले, पक्षनेतृत्वाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आणि मी याकडे आव्हान म्हणून पाहत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा प्रिया दत्त संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन मुंबईमध्ये काँग्रेस मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.