५ वर्षे नव्हे तर २५ वर्षे सरकार टिकेल : पवार

0
मुंबई : जनता ही नेहमी काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर २५ वर्षे टिकेल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, कधी नव्हे ते मिळालेली सत्ता हातून गेल्याने येणारी अस्वस्थता विरोधकांमध्ये या वर्षभरात पाहायला मिळाली. विरोधकांच्या टीकेमुळे अनेकांनी या सरकारविषयी शंका उपस्थित करून ठेवल्या होत्या. त्यामुळेच सरकारसंबंधित चिकित्सा करण्याची भूमिका माध्यमांनीदेखील घेतली. मात्र हे सरकार सगळ्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे गेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो यावर अजूनही विश्वास बसत नाही. जे लोक शिवसेनेला गृहीत धरून चालले होते त्यांना आता कळून चुकले की, शिवसेना फरपटत जाणाऱ्यांपैकी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. आपल्याला संघर्षाचा चांगला अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथपर्यंत आलो. आशीर्वाद कसे कमावू शकतो हे वर्षभरात मी अनुभवले. शरद पवार वर्षभरात ज्या ज्या वेळी भेटले त्या वेळी त्यांनी अनुभवातून आलेले प्रसंग सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.