निष्ठेपुढे खोकेवाल्यांचा धर्म कसा टिकेल ?

0

मुंबई : आज होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

कुणी कितीही अपशकुन केला तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकतच राहील. शिवसेना तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकेल. पुढच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल अशी टीका भाजपवर करण्यात आली आहे. तर खोकेवाल्यांचा धर्म निष्ठेपुढे कसा टिकेल? जिथे धर्म तिथे जय! अशा शब्दांत शिंदे गटावरही यातून निशाणा साधण्यात आला आहे.

विजयादशमीच्या पवित्र मुहूर्ताची निवड काही नतद्रष्टांनी मराठी एकजुटीत फुट पाडण्यासाठी आणि शिवसेनेला कमजोर करण्यासाठी केली आहे. पण शिवसेना ही लेचीपेची संघटना नाही. अनेक लाटा आणि कारस्थानांचा सामना करत शिवतीर्थावरील सिमोल्लंघन सुरुच राहिले आहे. विजयादशमीचे हिंदू संस्कृतीत मोठे महत्व असल्यानेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मेळाव्यासाठी दसऱ्याचा दिवस निवडला.

अहंकारामुळे जसा रावणाचा बळी घेतला तशाच अहंकाराच्या वावटळी राज्यात निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात सर्व काही विस्कटलेले आहे. पैसा आणि धमक्यांनी बहुमतातले सरकार पाडणे पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याइतके सोपे आहे असे काहींना वाटत आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.

योग्य वेळ येताच विदर्भ स्वतंत्र करू असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणआले. विदर्भाचा लचका तोडण्याचे भाजप प्रदेशाध्यक्षांचे मनसुबे आहेत. त्यावर मिंधे गट गप्प बसला आहे. मुंबईचा लचका तोडायचा असेल तर शिवसेनेची वज्रमुठ तोडावी लागेल. म्हणूनच ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रात वेगाने घटना घडत आहेत. उद्योगपतींना फूस लावून महाराष्ट्रातील प्रकल्प पळवून न्यायचे हे कसले लक्षण मानावे? असे अग्रलेखात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.