मुंबई ः ”महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी २ महिने ६ दिवसांनी केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल फसल तो बहुत अच्छी है इनको मदत करनेकी जरुरत नही”, अशा टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पथकावर केली.
केंद्रीय पथकाच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी म्हणाले की, ”असा तत्पर चौकादार मिळाला नशीब लागतं”, असा खोचक टोला शेट्टींना पंतप्रधान मोदींना लगावला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे शेतकऱ्यांची परिस्थिती पाहण्याची विचारणा केली होती. त्यावेळी केंद्राकडून पथकं आली नाहीत. आता दोन महिन्यांनी नुकसाणीची पाहणी करण्यासाठी ही पथकं आली आहे, याच मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
”नरेंद्र मोदी सतत स्वतःचा उल्लेख चौकीदार म्हणून करतात. असे तत्पर चौकीदार पंतप्रधान मिळायला नशीब लागतं. आता हे दोन महिन्यांनी केंद्राची पथके शेतकऱ्याच्या शिवारात आली आहेत, आता तिथं जाऊन काय बघणार?”, असा खोचक प्रश्न शेट्टींनी विचारला आहे.