आमदार रोहित पवार यांचा केंद्रीय मंत्री दानवे यांना इशारा

0

अहमदनगर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा असे वक्तव्य केले तर आम्ही विरोधक म्हणून नाही तर राजकारणाबाहेर जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे. याबद्दल कर्जतमध्ये बोलताना पवार यांनी त्यांचा चांगलचा समाचार घेतला आहे.

पवार म्हणाले, ‘भाजपमध्ये अनेक लोक असे आहेत की ते अशी निराधार वक्तव्य करीत असतात. शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते.

दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.’

Leave A Reply

Your email address will not be published.