पुणे : राज्यात सर्वाधिक झपाट्याने पुणे आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. यावर पुणे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावावे असे न्यायालयाने सांगितले. यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनची आणखी कडक आंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
लसीच्या निर्यातीचा केंद्राने घेतलेला निर्णय चुकीचा होता. निर्यात करण्यात आली नसती तर, लसीकरणात अडचण निर्माण झाली नसती. रशियाने देशभरात लसीकरण पार पडल्यानंतर भारताला लसी पाठवल्या आहेत, त्यामुळे आपणही संपूर्ण देशात लसीकरण केल्यानंतर लसींची निर्यात करायला हवी होती, त्यामुळे केंद्राचा लसींच्या निर्यातीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, अशी टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्रावर केली आहे.
पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, “पुण्यात ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त आहेत. त्यामुळे पुण्यात कडक लाॅकडाऊन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कडक निर्बंधांची अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल”, असेही पवार यांनी सांगितले.
“लसींच्या पुरवठा कमी होत असल्याने सध्या लसीकरणामध्ये अडचण निर्माण होत आहेत. तरीही लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. जिथ रुग्ण वाढली आहे तिथे कडक निर्बंध करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणं गरजेचं आहे. विनाकारण बाहेर पडू नये, धोका टळलेला नाही. गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन घेऊ, “, अशीही माहिती पवार यांनी दिली.