पारगाव, भीमा नदीत आढळलेल्या ७ मृतदेहाचे गुढ उकळले; समोर आली धक्कादायक माहिती

0

पुणे : एकापाठोपाठ एक असे एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीत आढळल्याने मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या मृतांचे रहस्य उकलण्यात पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. मुलाने लग्नाकरिता एका विवाहित महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह, आई, बहिण, दाजी आणि त्यांची तीन लहान मुलं असे एकूण ७ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मोहन उत्तम पवार (५०), संगीता मोहन पवार (४५, दोघे रा. खामगाव, ता.गेवराई) त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (३२) त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (२७) श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (७), छोटू श्यामराव फुलवरे (५) आणि कृष्णा (३) असे एकूण ७ जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविशान शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे रहाण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. मोहन पवार हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (२०) याने त्यांच्याच समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला १७ जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते.

अनिलने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून त्याबाबत माहिती दिली. तुझ्या छोट्या भावाने समाजातीलच एक विवाहित महिलेला पळवून नेले आहे. त्यामुळे तीला परत आणण्यास त्याला सांग, अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू. त्यानंतर त्या दिवशी रात्रीच मोहन पवार हे त्यांच्या कुटुंबासह समाजात बदनामी होईल या भितीने दुसरीकडे निघून गेले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.

यानंतर एकापाठोपाठ एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह पारगाव येथील भीमा नदीत आढळल्याने सर्व प्रकार समोर आला. यवत पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.