पुणे : आंतरराज्यीय आणि परदेशातून विमानाने आणि रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सरकारने बंधनकारक केली आहे. मात्र अनेकदा कुठलीही तपासणी केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे विमानतळावर, रेल्वे स्थानकावर गेल्या पाच दिवसांत ३७५ प्रवाशांची अचानक चाचणी केली असता 15 जण पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. प्रवासी आणि विमान कंपन्या यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा हा आकडा वाढला आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून येणाऱ्या विशेषत: विमान आणि रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाची चाचणी बंधकारक आहे. प्रवाशांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांचीही (आरटीपीसीआर) तपासणी करावी लागेल, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
हा चाचणी अहवाल दाखविल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, हेही आदेशात स्पष्ट असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी पुणे महापालिकेनेही लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वेस्थानकावर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. त्याचवेळी चाचण्या करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, बहुतांशी प्रवाशांनी चाचणी केली नसल्याचे दिसून येत आहे.