‘पावनखिंड’ या पहिल्याच मराठी चित्रपटाने रचला इतिहास

0

मुंबई : बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. एकच दिवसात इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकले आहेत.

स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

‘पावनखिंड’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. 18 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे.

‘पावनखिंड’ सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.