बुलेट ट्रेनचा मार्ग मुंबई-औरंगाबाद-जालना-नांदेड-हैदराबाद असा असावा

0

मुंबई :  बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-औरंगाबाद-जालना-नांदेड-हैदराबाद असा मार्ग करावा असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई ते नागपूर तसेच पुणे, सोलापूर मार्गे मुंबई ते हैदराबाद अशा मार्गांचे नियोजन केले जाते आहे. परंतु, या नियोजनात मराठवाड्याला योग्य न्याय मिळालेला नाही. मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी औरंगाबाद, नांदेड हा मार्गसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई- औरंगाबाद- जालना-नांदेड-हैदराबाद असा दुसरा मार्गही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने समृध्दी महामार्गाला जोडणारा जालना- नांदेड द्रुतगती महामार्ग मंजूर केला असून, त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे.

या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीतून मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला जालना- नांदेडपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. हाच मार्ग पुढे नांदेडवरून हैद्राबादपर्यंत विस्तारित करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करता येईल. त्यामुळे मुंबई- हैदराबाद प्रवासासाठी पुणे-सोलापूर मार्गे आणि औरंगाबाद-नांदेड मार्गे असे दोन पर्याय उपलब्ध होतील, असं अशोक चव्हाण यांनी सूचवलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.