नवी दिल्ली : देशातील ६० वर्षांवरील सर्वांना १ मार्च पासून कोरोनावरील लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच ४५ पेक्षा अधिक वय पण व्याधी असलेल्यांनाही लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. लसीकरणाच्या या टप्प्यात साधारणपणे २७ कोटी लोेकांना लस देण्याचे ठरले आहे. त्यापैकी सुमारे १० कोटी लोक ६० वर्षे वयावरील आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धे अशा तीन कोटी लोकांना लस देण्याची मोहीम अद्यापसुरू आहे.
महाराष्ट्रात सुमारे १०३५ केंद्रे, रुग्णालये, दवाखाने येथे १ मार्चपासून लस दिली जाईल. यापैकी ५१७ सरकारी, तर उरलेली खासगी असतील. ही लसीकरण केंद्रे कोणती व कोठे आहेत, हे लवकरच ऑनलाइन कळू शकेल. ज्या ज्येष्ठांना व अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस घ्यायची असेल, त्यांनी ऑनलाइनच अर्ज करायचा आहे.
त्यानंतर त्यांना कोणत्या केंद्रावर, किती वाजता जायचे, याचा मेसेज मोबाइलवर येईल. त्याचवेळी तिथे पोहोचणे अपेक्षित आहे. त्याआधी केंद्रापाशी कोणीही गर्दी करता कामा नये.