“शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”

0

पंढरपूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार भाजपात सामील झाले तर नवल वाटून घेऊ नका, असं विधान सुषमा अंधारेंनी केलं आहे. हा भाजपाचा ट्रॅप आहे, असंही अंधारे म्हणाल्या. पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी हे विधान केलं आहे.

भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजत नाही. शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार फोडून भाजपाला स्वत:चा पक्ष मोठा करायचा आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदासाठी थेट नरेंद्र मोदींनाही आव्हान देतील, अशी खोचक टिप्पणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

शिंदे गटाला संपवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “भाजपाच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही नाही. हे आमच्या एकनाथ भाऊंना कधी कळेल? तो सुदिन असेल. भाजपाच ‘ट्रॅप’ टाकत आहे, हे एकनाथ भाऊंच्या लक्षात यायला हवं. भाजपाच अडकवत आहे. भाजपाच संपवत आहे. देवेंद्र फडणवीसांनी जर उद्या एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या ४० पैकी २० आमदारांना फोडून आपल्या पक्षात सामील करून घेतलं, तर नवल वाटून घेऊ नका. कारण देवेंद्रजी ‘उस बला का नाम है’… येणाऱ्या काळात पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना आव्हान देणारं कुणी असेल, तर ते देवेंद्र फडणवीस असतील.”

दरम्यान, एका जुन्या व्हिडीओवरून वारकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ” “सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती भाजपाने माझ्याविरोधात जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे. मुळात जो सच्चा वारकारी आहे, तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यापेक्षा चिकित्सक बुद्धीने प्रश्न विचारेल किंवा तर्काच्या आधारे चर्चा करण्याचं आव्हान देईल. पण तो अशी अमंगल आणि अभद्र भाषा वापरणार नाही. मुळात माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार किंवा वारकरी हे भागवत संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. त्यामुळे भागवत संप्रदाय वेगळा आहे आणि मोहन भागवत संप्रदाय वेगळा आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.