मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असतानाच राज्य शासनाने १४ एप्रिलला राज्यात कडक निर्बध लागू केले आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी त्या नियमात बदल करून आणखी कठोर निर्णय घेतला गेला. हा लॉकडाऊन १ मे पर्यंत लागू केला आहे. आता मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता १ मे नंतरही आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत संकेत दिले होते.
राज्याची कोरोनामुळे होणारी परिस्थिती पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्य सरकाराने १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. यावरून टास्क फोर्सने म्हटलं होत की, राज्यातील लॉकडाऊन हा ७ दिवसांसाठी वाढवावा, दरम्यान, १३ मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे राज्यातील काही मंत्र्यांनी मत व्यक्त केले होते.