जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अजित पवारांनी लक्ष घालावे : शिवेंद्रराजे भोसले

0

सातारा : कोरोना महामारीचा विळखा सातारा जिल्ह्यात अधिकच घट्ट होत चालला आहे. जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सातार्‍यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष घालावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

जिल्हात प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन असतानाही गेल्या महिनाभरात रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही मग आता या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये येईल, असे वाटत नाही. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये 1423, पुणे जिल्ह्यात 900, सोलापूरमध्ये 1536, सांगलीमध्ये 1126 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1774 च्या आसपास बाधित रुग्ण आढळून आले आणि सातारा जिल्ह्यात तब्ब्ल 2648 रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत असून ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

महिनाभर लॉकडाऊन असूनही परिस्थिती आटोक्यात आली नाही. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोक तसेच हातावर पोट असणार्‍या, रोजंदारी करणार्‍या गोर- गरीब लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. असंख्य लोकांची उपासमार सुरु आहे. लॉकडाऊन असाच सुरु राहिल्यास लोकांना उदरनिर्वाह करणे आणि जगणे मुश्किल होणार आहे, याचीही अजित पवार, राजेश टोपे आणि प्रशासनाने गंभीर दाखल घ्यावी. तसेच रॅपिड अ‍ॅक्शन टेस्टमध्ये वाढ करावी.

ग्रामीण भागात सर्वत्र रॅट टेस्ट किट उपलब्ध करून द्यावी आणि बाधित आहेत पण कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांचा शोध घ्यावा, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडली जाईल. यासाठी ना. पवार आणि ना. टोपे यांनी सातार्‍यात यावे. परिस्थीतीचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात आणि जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे यांनी केले आहे.

लॉकडाऊन सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चूक होत आहे हे निश्चित. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना. पवार आणि आरोग्यमंत्री ना. टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे. त्यांनी तातडीने सातार्‍यात यावे आणि जिल्ह्यातील कोरोना महामारीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकार्‍यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कोरोनाला आळा घालण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे आणि नियोजनबद्धरीत्या जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.