मुंबई : राज्यात कोरोना आणि आता कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे कठोर डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण लागू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात यासंदर्भात बुधवारी चर्चा झाली असून निर्बंध वाढवायचे की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्यातली रूग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी केली. डेल्टा प्लस विषाणूचा धोकाही वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यातच निर्बंध शिथिल झाल्यामुळे बाजारपेठांमधली गर्दीही वाढत आहे.
सध्याच्या सर्व परिस्थितीचा विचार करता निर्बंध शिथिल करण्याच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय अजून झालेला नाही. मात्र कदाचित राज्यातील ही स्थिती लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध कडक केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जगभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा वेगाने फैलाव सुरू आहे. जगात डेल्टा प्लस व्हेरियंटचे तब्बल 205 रूग्ण झालेत. यापैकी 40 रूग्ण भारतात आहेत. तर राज्यात 21 रूग्ण आढळले आहेत.