पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात

0
मुंबई  : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तूकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्हयांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयांमधील अनेक नदया धोका पातळीवर वाहत असल्याने  एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
पूर परिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी  शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्हयांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकडया तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्हयामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.
एनडीआरएफ च्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे.  आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज झाली आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.