भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी ‘ते’ तीनजण दोषी

0

इंदूर : भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत इंदूर न्यायालयाने तीन जणांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने ज्यांना दोषी ठरवलं आहे त्यामध्ये भय्यू महाराज यांचा केअरटेकरचाही समावेश आहे. सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक  या तिघांना न्यायालयाने भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. भय्यू महाराज यांनी 2018 मध्ये स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

विनायक, शरद आणि पलक यांनी भय्यू महाराजांना एवढा त्रास दिला की त्यांनी आत्महत्या केली असं न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्यापुढे भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारी (दि.28) झाली. ही सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आरोपी निर्दोष आहेत का दोषी याचा निवाडा केला. विनायक, पलक आणि शरद यांना दोषी ठरवल्यानंतर आता त्यांना काय शिक्षा द्यायची यावर युक्तिवाद  होऊन संध्याकाळपर्यंत त्यांच्या शिक्षेबाबत आदेश येण्याची शक्यता आहे.

तीनही आरोपी हे भय्यू महाराज यांच्या जवळचे होते. त्यांचा या तिघांवर एवढा विश्वास होता की त्यांनी आश्रमाची सर्व जबाबदारी या तिघांवर सोपवली होती. याचाच गैरफायदा घेऊन तीनही आरोपींनी भय्यू महाराजांना पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासातूनच त्यांनी आत्महत्या केली होती.

आरोपी विनायक याचे वकील आशिष चौरे  यांनी हे आरोप  फेटाळून लावले होते. भय्यू महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची सगळी जबाबदारी विनायकला सोपली होती. त्यामुळे त्याला खोट्या प्रकरणात गोवलं गेलं असा युक्तीवाद चौरे यांनी केला होता. भय्यू महाराज पुण्याला जात असताना कोणाचा तरी त्यांना सतत फोन येत होता, याचा पोलिसांनी नीट तपास केला नसल्याचा दावाही चौरे यांनी त्यांच्या युक्तिवादात केला होता. आरोपी शरद याची बाजू वकील धर्मेंद्र गुजर यांनी मांडली तर पलक हिची बाजू वकील अविनाश शिरपूरकर यांनी मांडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.