जालना : जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नुतन वास्तूचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ”वास्तविक पाहता राज्य सरकारने कोरोना काळात रुग्णांवर चांगले उपचार करून रुग्णांना मृत्यूपासून वाचवलं. पण काही जणांना राज्य सरकारचं कौतुक परवडत नाही. त्यामुळे त्यांना पोटदुखी आणि मळमळ होत असून त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थितांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी कोणी माझं कौतुक केलं, की मला धडधड होते, असं सांगत त्यांनी दबंग चित्रपटातला डायलॉग थप्पड से डर नही लगता, साहब प्यार से डर लगता है हा डायलॉग म्हणत विरोधकांना टोला लगावला. पण हे कौतुक वेगळं असून थपडा देणं आणि थपडा खाणं हे आमचं आयुष्य असल्याचं सांगत कुणी माझं कौतुक केलं की मला धडधड होते,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ”जे आरोप करतात त्यांनी राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि स्वतःचा आरोग्य केंद्रात सरकारी दराने ईलाज करून घ्यावा किंवा फुकट करुन देऊ, असं सांगत त्यांचा ईलाज करणं हे सरकारचं कर्तव्य आहे,” असा टोला देखील त्यांनी कोणाचे नाव घेता लगावला. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, मंत्री आदिती तटकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.