‘शिवद्रोह होत असेल, तर अशांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल’

छत्रपती उदयनराजे यांनी लिहले छत्रपती शिवाजी महाराजांना एक भावनिक पत्र

0

सातारा : शिवद्रोह होत असेल, तर अशांना वठणीवर आणू. त्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल, असा इशारा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपली वेदना मांडलीय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याविरोधात उदयनराजे आक्रमक झालेत. त्यांनी आज रायगडवर ‘निर्धार शिवसन्माचा’ म्हणत कूच केले. राज्यपाल पदावरून कोश्यारींना हटवा, अन्यथा मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा दिलाय. त्यानंतर उदयन राजे यांनी लिहिलेले हे पत्र समोर आले आहे.

उदयन राजेंचे पत्र जसेच्या तसे

मुजरा महाराज,
महाराज…

आज खूप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची, आम्ही आपल्याशी अंश-वंश म्हणून नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतोय. आपण स्वराज्याचा पाया रचला, त्याला पावणे चारशे वर्षे झाली. एवढ्या वर्षात आम्हाला कुणाला आपल्याकडे वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाही. कारण, आपण रयतेसाठी इतके मोठे स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र, आपला हिंदुस्थान, आपण घालून दिलेल्या आदर्शावर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता. अलीकडच्या काळात हद्द झाली. विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय अशी रास्त भीती निर्माण झाली. अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेवून निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय, असा विचार येवून मन विषण्ण झाले. म्हणूनच फक्त मनमोकळं करायला लिहितोय, मनोमन समक्ष उपस्थित राहून हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो. सगळीकडेच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचं कुठं? व्यथा मांडायची कुठं? सगळं दिशाहीन झालंय. एकही विश्वासाचं ठिकाण राहिलं नाही. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय महाराज..

महाराज, आपण इथल्या किल्ल्यात, पर्वतात, नदीत, जंगलात, डोंगररांगात, मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक माणसाच्या मनात आदात. आपल्याबद्दल लिहिल्या, बोलल्या जाणा-या प्रत्येक शब्दांत आजही तेवढाच आदर असतो. अभिमान असतो. डोक्यात मोठा आणि छोटा मेंदू, जागच्या जागी असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर नतमस्तक आहे. पण छोटा आणि मोठा मेंदू सोडून, काही मुठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा मेंदू असतो. टाळू भरताना, सटकन डोक्यावर पडलेली दोन-चार मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात वाईट वाटतं. विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील ही विकृती आहे. हे स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. आपल्या विषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्या सारख्या विश्वाचं दैवत असलेल्या छत्रपतींचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही.

आपल्यावर आमचा जेवढा हक्क आहे, तेवढाच हक्क प्रत्येक मावळ्याचा आहे. मायमाऊलींचा हक्क आहे. वडिलधाऱ्यांचा आणि सर्वांचाच हक्क आहे, म्हणून आपल्याबद्दल चुकीचे उदगार काढण्याची हिम्मत दाखवणाऱ्या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिले आहे. पण, आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मुठभर लोकांच्या मनातील ही विकृती कायमची ठेचायची आहे. ही एकट्या दुकट्याची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही. ही फक्त मराठी माणसाची लढाई नाही तर देशाच्या अस्मितेचा लढा आहे. म्हणूनच थेट आपल्याशी संवाद साधतोय.

महाराज एक गोष्ट आज पुन्हा प्रकर्षाने जाणवली, तुमचे मावळे नावालाच एक आहेत. आमचे गट, तट वाढलेत. प्रत्येकाला त्याचा गट, त्याची विचारधारा याचा फायदा बघायचा आहे. हरकत नाही. पण एकत्र यायला एक कारण किंवा एक विषय आजही आम्हाला पुरेसा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता कुठल्या गटाचा असो किंवा कुठल्या जाती-पातीचा असो. जो कोणी आपला मावळा आहे, तो आपल्यासाठी एकत्र येणारच. आणि या मावळ्यांचा जो निर्णय असेल, तो आम्हाला शिरसावंद्य असेल. पण इथून पुढे आपल्याबद्दल एक वाक्य काय, एक शब्द जरी कोणी चुकीचा बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही. आपले संस्कार आहेत आमच्यावर…

आजवर कधी कुठल्या कलाकृतीला विरोध केला नाही. राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातो. आपल्या नावाने घोषणा दिल्या जातात, पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर, राजकारणी मूग गिळून गप्प बसतात तेव्हा वाईट वाटतं. उठसूठ आपली तुलना कोणाशीदी करणा-यांना इतिहासाचा धडा शिकवावाच लागणार आहे. आजवर आम्ही विचारी लोकांना मान दिला म्हणून विकृतींना मान देणार नाही. आपल्याला वचन देतो, आपल्या पदस्पर्शने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण आम्हाला स्वधर्माबरोबरच सर्वधर्मसमभावाची शिकवण दिलीय. पहिल्यापासून आम्ही कायम आपल्या मावळ्यांच्या सोबत आहोत. आणि जे काही करायचं ते आम्ही एकत्र मिळून करू.

 

महाराज…. आपल्याकडून एक गोष्ट शिकलोय, एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येणार नाही. यात कुठंही राजकारण न आणता, एक होण्याची हीच ती वेळ आहे. विकृत लोकांशी कसं वागायचे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. परंतु इथं काही विकृत माथी आहेत. ती कायमची वटणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे. आपल्या माणसावर वार करायचा नसतो पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अश्यांना कठोर शासन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. आणि महाराज, आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही.

महाराज.. आशिर्वाद द्या…..
जय भवानी, जय शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय

Leave A Reply

Your email address will not be published.