नवी दिल्ली : भारताने 7 व्यांदा महिला आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने शनिवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 8 गड्यांनी धूळ चारली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाच्या आक्रमक माऱ्यापुढे त्यांना 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 65 धावाच करता आल्या. लंकेतर्फे इनोका रनवेराने सर्वाधिक 18 धावा केल्या. भारतासाठी रेणुका सिंह ठाकूरने 3, तर राजेश्वरी गायकवाड व स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल भारताने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या 8.3 षटकांतच 71 धावांचे आव्हान पार केले. स्मृती मंधानाने षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ती 25 चेंडूंत 51 धावा करून नाबाद राहिली. तिने 6 चौकार व 3 षटकार खेचले. तिचा स्ट्राइक रेट 204 राहिला. कर्णधार हरमनप्रीत कौर 11 धावांवर मंधानासोबत नाबाद राहिली.
टीम इंडियाने आशिया चषकाच्या इतिहासात फायनलमध्ये श्रीलंकेला 5व्यांदा धूळ चारली. दोन्ही संघांत आतापर्यंत 5 फायनल्स खेळले गेले. ते टीम इंडियाने एकहाती जिंकले. भारतीय संघ सलग 8व्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता.
भारताने 14 वर्षांनंतर आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. यापूर्वी 2008 मध्ये दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकमेकांपुढे उभे टाकले होते.