मुंबई : मागील तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खांदेशामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने आज विदर्भात सर्वत्र हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये अकोला, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान खात्याने सोमवारी याच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. आजही ती कायम आहे. या 11 जिल्ह्यामध्ये आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान खात्याने दिली आहे.
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात पावसाची शक्यता
खानदेश आणि मराठवाड्यात कमी पाऊस पडल्याने चांगल्या पावसाची अतुरता लागली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या 8 जिल्ह्यात विजांचा कडकडाट होण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये सायंकाळनंतर एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज पहाटे मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात पहाटे काही ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात अंशत: ढगाळ हवामान होतं. त्यामुळे आज मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. हवामान खात्याकडून मुंबईबाबत कोणताही इशारा दिलेला नाही.