नाशिक : राज्यात शिक्षण विभागातील लाचखोर वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकामागून एक प्रकरणे उघडकीस येत असतानाच आता खुद्द शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनीच लेटरबॉम्ब टाकला आहे. लाचखोरीत अडकून पळवाटा शोधून यापूर्वी मुक्त झालेल्या व पुन्हा सेवेत इमानेइतबारे रुजू झालेल्या शिक्षण विभागातील ४० अधिकाऱ्यांची खुली चौकशी करावी आणि त्यांना शिक्षा ठोठवावी, असे पत्रच त्यांनी लाचलुचपत व प्रतिबंधक विभागा पाठवले आहे.
नाशिकच्या मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना एसीबीने पकडल्यानंतर त्यांच्या घरी कोट्यवधींची ‘माया’ सापडली. हे प्रकरण ताजे असताना ट्रॅपनंतरही कायद्यातील पळवाटा शोधून काहीतरी कारणे काढून काही अधिकारी यातून सुटले आहेत. विशेष म्हणजे पुन्हा ते नोकरीवर रुजूही झाले आहेत. हे प्रकार थांबावे या हेतूने या अधिकाऱ्यांची पुन्हा सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मांढरे यांनी पत्राद्वारे एसीबीकडे केली आहे. याबाबत अपेक्षित माहिती एसीबीकडून शिक्षण आयुक्तांकडे प्राप्त झाली नसल्याने आता पुन्हा एकदा या विभागाला स्मरणपत्र देण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
एसीबीकडूनही दुजोरा; पुणे विभागातील १० अधिकाऱ्यांची यापूर्वीच चौकशी सुरू
१७ कार्यालयांकडे पाठपुरावा : तांबे
एसीबी पुण्याचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले ‘आयुक्तांनी शिक्षण विभागातील लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी करावी, असे पत्र दिले आहे. मुळात एखादा शासकीय कर्मचारी पकडला गेल्यास त्याची उघड चौकशी आम्ही करतोच. हे पत्र मिळण्यापूर्वीच आम्ही पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील १० लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी सुरू केली आहे. यात १७ कार्यालयांशी पाठपुरावा करून संबंधित व्यक्तीचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालून नेमकी किती अपसंपदा जमवली याचा अहवाल तयार करण्यात येतो.